धाराशिव (प्रतिनिधी)- सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदाना पासून वंचित राहिले आहेत. त्या सर्वानाच मदत मिळायला हवी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. वस्तुनिष्ठ परिस्थिती चा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या असून मदतीपासून वंचित उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री यांनीही अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख 81 हजार शेतकऱ्यांना राज्यसरकारने 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.याच कालावधीत धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती. मात्र झालेले नुकसान मोठे होते. अनेक ठिकाणी सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही ती नोंदविली गेली नाही. त्यामुळे 2022 साली ओढवलेल्या आपत्तीवेळी केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित 24 महसूल मंडळात दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरला होता. अगदी तीच प्रक्रिया अनुसरून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही आपण पत्राद्वारे त्याचवेळी केली होती. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.