धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्याला नवीन 25 कोऱ्या बसेस मिळाल्या आहे.त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नव्या कोऱ्या 25 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.या बसेसच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक चांगली,आरामदायी आणि सुरक्षित वाहतूक सेवा मिळणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रवासासाठी एस.टी.बसेस हाच मुख्य पर्याय आहे.गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जुन्या बसेस बंद पडल्या होत्या.त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. नव्या बसेस आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर तर होणार आहेच सोबत वाहतूक सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

या सर्व 25 बसेस बीएस -6 अत्याधुनिक सोयींनी युक्त असून ह्या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुलभ व आरामदायी आसने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरक बनवण्यात आल्या आहेत.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव जिल्ह्यासाठी 25 बसेस देण्यात आल्या आहेत.  धाराशिव, तुळजापूर, कळंब या आगाराला या बसेस देण्यात आल्या आहेत. त्या मुख्यतः मोठया शहरांकडे धावणार आहेत. त्या मुंबई, बोरिवली, हैदराबाद, पुणे, कोल्हापूर, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांसाठी सोडण्यात येणार आहे.  त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून नव्या बसेस मिळाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक प्रवासी गेल्या काही महिन्यांपासून अधिक बसेसची मागणी करत होते. आता या नव्या बसेस आल्याने प्रवास अधिक सुलभ व लवकर होण्यास मदत होणार आहे.

 
Top