धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. ज्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी-नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 81 हजार शेतकऱ्यांना राज्यसरकारने 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहिता असताना निवडणूक आयोगाच्या अनुमतीने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी यासाठी ना.देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत. मात्र अतिवृष्टी आणि सततचा पाऊस नसतानाही, ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे, तिथे तलाठ्यांमार्फत नुकसानीचे पंचनामे करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याच्या सूचना तहसीलदार तथा कृषी अधिकाऱ्यांना आपण दिल्या होत्या. पाडोळी शिवारात साधारणपणे दोन हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी नदीकाठी पुरामुळे 350 हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मदत केली जाते अगदी त्याप्रमाणेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या एक लाख 63 हजार 97 हेक्टर क्षेत्रावरील 80 हजार 786 शेतकरी बांधवांच्या नुकसनीपोटी 221 कोटी 81 लाख 30 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. 


वगळलेल्या महसूल मंडळासाठी पाठपुरावा करणार

जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद असल्याची बाब आपण स्वतः  प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांना 18 ऑक्टोबर रोजी पत्र लिहून निदर्शनास आणून दिली होती. जिल्ह्यातील अन्य महसूल मंडळातील वस्तुस्थितीही त्याचवेळी त्यांच्या ध्यानात आणून दिली. धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद नाही. मात्र झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे त्या महसूल मंडळास मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

 
Top