नळदुर्ग (प्रतिनिधी)-काँग्रेस पक्षाने चव्हाण यांच्यावर अन्याय केला असून,पक्षाने पुनर्विचार करून पुन्हा मधुकर चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, नाहीतर चव्हाण यांनी आता सय्यमाने न घेता आपला अपक्ष फॉर्म भरावा. जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करीत अणदूर मधील हजारोच्या संख्येने नागरिकांनी मधुकर चव्हाण यांना घरी जाऊन आग्रह केला.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अणदूर व परिसरातील जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्याचाच एक भाग म्हणून हजारो नागरिकांनी सकाळी चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आता माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी चव्हाण यांनी योग्य निर्णय घेऊ आपण शांत रहावे असे सांगितले. या वेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. या वेळी ऍड. विशाल शेटे, माजी सरपंच धनराज मुळे, शरणप्पा कबाडे, अणदूर चे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, ग्रामपंचायत सदस्य डॉ विवेक बिराजदार यांची भाषणे झाली,झालेल्या भाषणात काँग्रेस पक्षाने घोषित केलेली उमेदवारी बदलून चव्हाण यांना घोषित करावी, नाहीतर चव्हाण यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. तसेच उद्या हजारोंच्या संख्येने नागरिक बंधू भगिनींनी तुळजापुरात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करण्यात आली. या वेळी आप्पू धमुरे, संतोष दादा मुळे, संगप्पा हगलगुंडे, बाबुराव मुळे, कारबसपा धमुरे, मधुकर बंदपट्टे, खंडू मुळे, सुधीर ठाकूर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.