तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्राचा विकास करत असताना सर्व भागाचा विकास होईल अशा पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. मातंगी मंदिर विकास योजनेचा समावेश या योजनेअंतर्गत करणे गरजेचे आहे. त्यातच नव्याने येणारे रेल्वे, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, भाविक या ठिकाणी मुक्कामी कसा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मत माजी मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केले.
जेणेकरून तुळजापूर शहराची भरभराट होईल आणि तसेच स्थानिक व जवळच्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. यापूर्वी आघाडी सरकारने मंजूर केलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे हुतात्मा चौक ते किसान चौकी रस्ता. भवानी रोडला समांतर असणारा हा रस्ता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असून हा रस्ता अद्याप सुरू झाला नाही. अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.