धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सर्व स्तरावर अपयशी ठरलेलं व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, महिला, बेरोजगार तरुण, अल्पसंख्यांक, कायदा व सुव्यवस्था इत्यादी प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळेच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आता थोडीफार नीतिमत्ता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड. रेवण भोसले यांनी केली आहे.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात दुष्काळामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत .जनावरासाठी पाणी व चाऱ्याचे कमतरता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले असतानाही त्यास नुकसान भरपाई अद्याप पर्यंत न देता फक्त थापा मारण्यातच मुख्यमंत्री दिवस काढत आहेत. महाराष्ट्रासह मराठवाडा प्रचंड दुष्काळाने होरपळत आहे. यासह अनेक प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे. त्यामुळे जर आपणाकडे थोडीफार नीतिमत्ता शिल्लक असेल तर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी ॲड. भोसले यांनी केली आहे.

 
Top