धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यात साहित्य चळवळ जोमाने वाढते आहे याचा मला आनंद वाटतो असे मत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केले . ‘सावित्रीच्या कविता , ‘ सय' आणि ‘ मातीचे जग' या तीन कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते .
रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी सकाळी अकरा वाजता धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालयात हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता . यावेळी कथाकार डॉ . भास्कर बडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते . अध्यक्षस्थानी साहित्यिका कमल नलावडे होत्या . मंचावर अक्षरवेलच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ .सुलभा देशमुख, ‘सावित्रीच्या कविता ‘ या कवितासंग्रहाच्या संपादिका डॉ . रेखा अनिल ढगे आणि श्रीमती कविता रमेशराव पुदाले, अपूर्वाई प्रकाशनाचे डॉ . रविंद्र चिंचोलकर, कवयित्री शिवनंदा माळी, ‘ज्ञानसूर्य प्रकाशनच्या उमा काळे - माळी व मारुती माळी आदी मान्यवर उपस्थित होते .
जिल्हाधिकारी डॉ .ओम्बासे म्हणाले की, ‘सावित्रीच्या कविता ‘ या कविता संग्रहात 50 कवयित्रींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या कविता समाविष्ट आहेत . तसेच या सोहळ्यात तीन कविता संग्रहांचा एकत्रित प्रकाशन समारंभ होतो आहे, या समारंभास साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती आहे . यावरून धाराशिव जिल्हयात साहित्य चळवळ चांगली रुजली असल्याचे जाणवते .आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला ताण-तणावांना सामोरे जावे लागते ,अशा वेळी साहित्याची आवड तणाव दूर करून जीवनात आनंद निर्माण करते.
प्रमुख वक्ते कथाकार डॉ.भास्कर बडे ‘सावित्रीच्या कविता ‘ या संग्रहावर भाष्य करताना म्हणाले “ पन्नास कवयित्रींनी या कविता संग्रहात योगदान दिले, हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच शक्य झाले. रेखा ढगे आणि कविता पुदाले यांनी संपादित केलेला ‘सावित्रीच्या कविता ‘ हा संग्रह मराठी साहित्यातील एक दस्तावेज ठरेल. कविता लिहिणे सोपे नसते हे खरे, मात्र किती कविता लिहिल्या यापेक्षा दर्जेदार कविता किती आहेत त्याला अधिक महत्व असते असेही त्यांनी सांगितले. सौ. शिवनंदा माळी यांच्या ‘सय' कविता संग्रहाविषयी बोलताना प्राचार्या डॉ .सुलभा देशमुख म्हणाल्या “या संग्रहातील कविता आई , वडील आणि बहिणीच्या आठवणी सांगणाऱ्या आहेत. या कवितांमधून वेदनेचा हुंकार जाणवतो तसेच सकारात्मकतेची वाटही दिसते. कवयित्रीने ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण कवितांमधून मांडले आहे.
कै. अलकनंदा माळी यांच्या ‘ मातीचे जग' या काव्य संग्रहाविषयी बोलताना डॉ .रविंद्र चिंचोलकर म्हणाले “ या संग्रहातील प्रत्येक कविता आशयघन आहे. या कवितांमधून ग्रामजीवनाचा गोडवा जाणवतो. शहरात मराठी भाषेचे धिंडवडे निघत असताना, ग्रामीण भागातील साहित्यिक मराठी भाषा जोपासण्याचे कार्य करीत आहेत, त्याचे हे चांगले उदाहरण आहे. अशा संग्रहांना शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात कमल नलावडे म्हणाल्या या सोहळयात प्रकाशित झालेने तीनही कविता संग्रह मुखपृष्ठ, आशय या सर्व दृष्टिने दर्जेदार आहेत . अक्षरवेल साहित्य मडळाने लावलेले साहित्य सेवेचे रोपटे बहरले आहे.
बागल परिवारातील मुला -मुलींनी स्वागतगीत गायिले. मोक्षा करवर यांनी सावित्रीचे गीत सादर केले . अनिल ढगे, सौ.विमल नवाडे, संस्कृती ढगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ .रेखा ढगे आणि कविता पुदाले यांनी प्रास्ताविकात सांगितले की दोन वर्षापूर्वी घेतलेल्या काव्य स्पर्धेतून ‘ सावित्रीच्या कविता' या संग्रहाची कल्पना सुचली व ती साकार झाली . सौ .शिवनंदा माळी यांनी प्रास्ताविकात त्यांच्या ‘सय' आणि भगिनी कै अलकनंदा ढगे यांच्या ‘मातीचे ‘ या कविता संग्रहांची पार्श्वभूमी सांगितली. ‘सावित्रीच्या कविता' हा संग्रह प्रकाशित करणारे अपूर्वाई प्रकाशन, पुणे चे डॉ . रविंद्र चिंचोलकर तसेच ज्ञानसूर्य प्रकाशनाच्या उमा काळे - माळी व मारूती माळी यांचा यावेळी सात्कार करण्यात आला. ‘सावित्रीच्या कविता ‘ या संग्रहात योगदान देणाऱ्या सर्व कवयित्रींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . सुनीता गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले .जयश्री फुटाणे यांनी आभार प्रदर्शन केले .कार्यक्रमास साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती.