धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील अल्पसंख्यांक समाजाचा मागासलेपणा दूर करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेदभाव न करता अल्पसंख्यांकांचा विकास केला आहे. त्यामुळे या पुढील काळातही अल्पसंख्यांक समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात आहे. राज्यातील जनता आपल्याला चांगली ओळखते. आपण कधीही समाजामध्ये भेदभाव केला नाही. मुस्लिम बहुल भागात व जिथे गरज आहे, अशा दोन्ही जागी शादीखान्यासाठी आपण प्रत्येकी पाच कोटी रुपये दिले आहेत. शेतीमुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी जास्त आहे, त्याला हजारो कोटी रुपयांचा निधी लागतो. केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्यासाठी आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे. आपल्या लोकसभा क्षेत्रात विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी मोदी सरकारच्या विचारसरणीला अनुकूल लोकप्रतिनिधी निवडून देण्याची आवश्यकता आहे. राज्यातही आपले विचाराच्या सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यासाठी आपल्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रातून महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून आणले पाहिजे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. यावेळी महायुतीचे अल्पसंख्याक समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top