तुळजापूर (प्रतिनिधी)- तब्बल एक महिन्यापासून सुरू असलेल्या धाराशिव लोकसभेची रणधुमाळी शांत झाली असून मतदानादिवशी प्रचारातील सर्व मुद्दे गायब होऊन म फॅक्टर दोन्ही बाजूने जोरदार चालला असल्याचे बोलबाला आहे. धाराशिव मराठा आरक्षण व मनी पॉवर अर्थात 'लक्ष्मीदर्शन' जोरदार झाल्याने मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकला, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. यंदा राज्यात कमालीची चुरस पहावयास मिळाली.
धाराशिव लोकसभेसाठी विधमान खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार पत्नी अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्यात जोरदार लढत पहावयास मिळाली. या मतदारसंघात प्रचाराने टोक गाठले होते. शेतकऱ्यांची नाराजी, महागाई व संविधान बदलाबाबत होत असलेला आरोप यामुळे यंदाची लढाई महायुती साठी नक्कीच सोपी नव्हती. धाराशिव लोकसभा मतदारसंघात तर सत्ताधारी महायुतीने अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवार जाहीर
दिल्यानंतर अल्पावधीत त्यांनी प्रचारात वेग घेतला.पाटील यांनी आक्रमक प्रचार सुरू करून मागील अंतर भरून काढले होते.
यंदा राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कमालीची राजकीय चुरस पाहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकांप्रमाणे प्रचारात रंगत आली होती. कडाक्याचा
उन्हाळा, तीव्र पाणीटंचाई असताना देखील नागरिक मात्र निवडणुकीमध्ये गुंतले होते. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश देवुन महायुती ने महाविकास आघाडी पुढे कडवे आवाहन उभे केले होते. धाराशिव जिल्हयात शिवसेना उबाठा यांना मानणारा वर्ग असून यामध्ये शरद पवार व क़ाँग्रेस यांची भर पडल्याने अल्पावधीतच मशाल हे चिन्ह गावागांवामध्ये पोहोचले होते.
परंत, अखेरच्या टप्प्यात माञ घडलेल्या घटनांमुळे म फॅक्टरचा प्रभाव अचानक यात वाढला. भाजपने मराठा आरक्षण दिले नाही, असा आरोप सुरू झाला. तर माजी खासदार रवि गायकवाड यांनी मुस्लीम धर्मा बद्दल केलेले वक्तव्य हे मतदान कार्ड जोरात चालण्यास कारणी भूत झाल्याची चर्चा होत आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले नाही. परंतु त्यांनी सत्ताधारी विरोधात सूचक इशारा दिला. जरांगे-पाटील यांनी मोठे आंदोलन उभारल्यामुळे तरूणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. तसेच मराठा समाजातील गावगाड्यातील सामान्य व्यक्तीपासून सुशिक्षित वर्गदेखील त्यांच्या पाठीशी राहिला आहे. मराठा मतदान मतदारसंघात निर्णायक असल्याने येथे हा म फॅक्टर बरोबरच म (मनी) चालल्याची चर्चा सध्या सर्वञ चर्चिली जात आहे.