धाराशिव (प्रतिनिधी)-युवक काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष निवडीवरुन जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवड करणे अपेक्षित असताना परस्पर ही निवड करण्यात असून ही निवड स्थगित करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे केली आहे. चार दिवसांत निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील पदाधिकारी पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी गेली अनेक वर्षापासून पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. सर्वांनी युवक काँग्रेस निवडणूक प्रक्रियेतून पक्षाला लाखो नोंदणीकृत सभासद दिलेले आहेत. या जिल्ह्यातील निवड प्रक्रियाही युवक काँग्रेसच्या नियमानुसार झालेल्या आहेत. यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी  जीवाचे रान करून आर्थिक झळ सोसून पदे मिळविलेली आहेत. तर काहींनी आपली शेतजमीन विकुन एकमेकांच्या विरोधात मते घेऊन पद मिळविलेली आहेत. युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष हे काँग्रेसच्या कुठल्याही प्रक्रियेत नसतानाही आणि ते जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस (फादरबॉडी) हे पद भोगत असताना, पैशाने गबरगंड असणारे, वशिलेबाजीने धाराशिव जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विचारत न घेता जिह्याचे माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक, माजी जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस महसचिव व युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारत न घेता दिलेले आहे. महाराष्ट्र प्रभारी यांना औसा तालुक्यातील वरिष्ठ पदाधीकाऱ्यांनी संगणमत करून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपद दिले आहे. नवनियुक्त धाराशिव अध्यक्ष हे पद युवक काँग्रेस चे साधे सदस्य ही नाहीत व सध्या विधान सभेच्या कार्यकारणीतही नाहीत अशा व्यक्तिला युवक काँग्रेस च्या नियमानुसार जिल्हाध्य करता येत नसतानाही सदरील अवैद्य निवड झालेली आहे.

याबाबत आम्ही प्रदेशाध्यक्ष यांना विचारणा केली असता त्यांनीही या पदाबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील फादर बॉडी जिल्हाध्यक्ष यांनाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. जर अचानक असे कोणीपण येवून जिल्हाध्यक्ष होत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्ता व पक्षाचे पूर्वीपासून काम करत अलेला कार्यकर्ता कधीच पुढे येवू शकणार नाही. युवक काँग्रेसच्या नियमानुसार जिल्हाध्यक्षानंतर उपाध्यक्ष यांना जिल्हाध्यक्ष पदाचा मान मिळायला हवा, पण जास्त श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून हे पद देणे योग्य नाही. म्हणून आम्ही पदाधिकारी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वरिष्ठ स्तरावर दाद मागत आहोत. युवक काँग्रेस कार्यकारिणीला बैठक घेवून अध्यक्ष ठरवणे गरजेचे होते. असे न करता वशीलेबाजीवर अध्यक्ष निवडने योग्य नाही. तरी सदरील बाबीची चौकशी व खातरजमा करून सदरीत व्यक्तीस निलंबीत न केल्यास आम्ही सर्वजण आमच्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अवधुत क्षीरसागर, श्रीनिवास पाटील, अमर तागडे, जिल्हा सरचिटणीस अण्णा महानवर, परंडा विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय तांबे, उपाध्यक्ष धनाजी सोनवणे, मोईज सय्यद, सरचिटणीस अमित पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष अभिजित कदम, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ, उपाध्यक्ष रोहीत कसबे, सचिव बबन हौसलमल, विवेक गायकवाड, नवज्योत शिनगारे, उमरगा विधानसभा सचिव हरी शिंदे, मिथुन राठोड, ताहेर शेख यांची स्वाक्षरी आहे.


 
Top