धाराशिव (प्रतिनिधी)- एकीकडे  शेतीमालाचा भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींसाठी आयातीला मुभा द्यायची आणि उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षभरात शेतकरी आत्महत्येत अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणून सरकारने मनाची नसेल तर जनाची लाज बाळगून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. पायातले हातात घेण्याची वेळ आणू नका, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्यातील सरकारला दिला.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव येथे सोमवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेट्टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. शेट्टी म्हणाले की, आज सोयाबीनला भाव मिळत नाही, दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर  बंदी घातल्यामुळे  देशातील 30 लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. प्रधान मंत्र्यांनी मित्र गौतम अदानी यांना पाम तेल आयात करण्यास  परवानगी  दिल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला मोठा फ्टका बसला आहे. त्यामुळे उद्योगपती श्रीमंत तर शेतकरी आणखी कंगाल होत आहे असे ते म्हणाले. संघटनेच्या विधी समितीचे अध्यक्ष ॲड. जाधव यांनीही सारकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली. संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, स्वाभिमानी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, रविंद्र इंगळे यांच्यासह अनेकांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, कार्याध्यक्ष रवीकिरण गरड, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विष्णू काळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, संपर्कप्रमुख किशोर गायकवाड, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नेताजी जमदाडे, तालुकाध्यक्ष गुरूदास भोजने, बाळासाहेब मडके, चंद्रकांत समुद्रे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 
Top