धाराशिव (प्रतिनिधी)-एक सामान्य माणूस काय करू शकतो हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहून सर्वांनाच आता लक्षात आले असेल. एका सामान्य माणसाने जर एखादी गोष्ट मनावर घेतली आणि त्याला समाजाचा तन-मन-धनाने पाठिंबा मिळाला तर काहीही घडू शकतं हेच आजच्या या सरकारच्या शासन निर्णयावरून लक्षात आल आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकारने आतापासून प्रयत्न करावेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आज या मिळालेल्या आरक्षणाबद्दल मी प्रथम शुभेच्छा देतो. मात्र यामध्ये काही गोष्टी या संशयास्पद व क्लिष्ट वाटत आहेत. त्यामुळे भविष्यात याला आव्हान देण्यासाठी काही लोक आतापासूनच तयारी करत आहेत. 16 फेब्रुवारी पर्यंत हा शासन निर्णय आहे. त्यानंतर याच्यावरती अंतिम निर्णय होणार आहे. तोपर्यंत सरकारने ज्या हरकत येतील त्या हरकतीवर योग्य तो तोडगा काढून मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण कसे मिळेल यासंदर्भात प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा यापूर्वी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकलं नव्हते. त्यामुळे हे आरक्षण 16 फेब्रुवारीच्या नंतर मिळाले का? याचे उत्तर मिळणार आहे.