धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी येथील प्राचार्य प्रा. डॉ. हरिदास फेरे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणुन मार्गदर्शन करतांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी उत्साही व सहजतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, चारित्र्य व ज्ञानसाधना आणि देशाच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू स्पष्ट केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अधिसभा सदस्य देविदास पाठक प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणुन अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याचे अनेक पैलू अभ्यास करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड ज्ञानसाधना करून ज्ञान मिळविले. आयुष्यात त्यांनी सतत अभ्यास केला.
अध्ययन हेच त्यांचे आयुष्य होते. मिळविलेले ज्ञान, व्यासंगाचा उपयोग देशहितासाठी केला. वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी येथील प्राचार्य हरिदास फेरे यांनी प्रमुख व्याख्याते म्हणुन मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व अथांग सागरासारखे आहेत. ज्ञानाने व्यक्ती विवेकी, चारित्र्य संपन्न, आदर्श व्यक्ती बनतो. बदलाची प्रक्रिया दीर्घकालीन आहे. विचारातून व्यक्तीच्या आचरणात आमुलाग्र बदल होतो. काळाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुसंगत आहेत. ज्याच्याकडे काही नाही, तो व्यक्ती शिक्षणातुन महान बनतो. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरू मानले. शिक्षण हे विकासाचे साधन आहे, असे मानले. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हे तत्वज्ञानानुसार विकासाचा विचार प्रकट केला. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी गुरू मानले. संत कबीराने देव माणसात आहे, हे तत्वज्ञान मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचे आदर्श आहेत. लोकशाहीत कोणाही व्यक्तीला अभ्यास करून यशस्वी व महान बनता येते. भारतीय राज्यघटनेनुसार देश चालतो. प्रत्येक नागरिकांनी राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे. राज्यघटना हा देशाचा ग्रंथ आहे. आपले हक्क व अधिकार त्यात लिहिलेले आहेत. आपण आपले हक्क व अधिकार समजून घेतले पाहिजेत. घटना तयार करतेवेळेस एक उद्देशपत्रिका तयार केली होती. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यावर आधारित राज्यघटना लिहिली. घटनेची अंमलबजावणी न्याय देण्यासाठी झाली पाहिजे. शासनकर्ते यांनी न्यायाच्या भावनेने कार्य केले पाहिजे. जी तत्त्वाची चर्चा करतात. ती माणस मोठी होतात. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. व्यसनामुळे संसार उध्वस्त होतात. माणसाने व्यसनापासून दूर असले पाहिजे. राजकिय सत्तेत न्याय हक्क सर्व समाजघटकांना मिळाले पाहिजे. आर्थिक व सामाजिक लोकशाही हा राजकिय लोकशाहीचा आधार आहे. न्याय व्यवस्था सर्वांना स्वातंत्र्य, न्याय देईल व लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होईल. त्यांच्या जीवनातील काही पैलू आपण अभ्यासले पाहिजे व अंगिकारले पाहिजे. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख तथा विदयापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की पुण्यतिथीनिमित्त विचाराचा जागर केला जातो. महापुरुषांचे गुण आपण घेतले पाहिजेत. आपले व्यक्तिमत्व विकसित होते, व विकासाचा विधायक दृष्टीकोन प्राप्त होतो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, म्हणुन छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. चरित्र अभ्यासातून अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे. तासनतास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. अनेक जोखडातून विद्यार्थ्यांनी बाहेर आले पाहिजे. समाज माध्यम विळख्यातून विद्यार्थ्यांनी बाहेर आले पाहिजे. कितीही संकटे आली तरी आत्मविश्वास डगमगु देऊ नका, असे मौलिक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. समाज उद्धार हे बाबासाहेबांचे ध्येय होते. एकाग्रता व सातत्यपूर्ण अभ्यासातून त्यांनी पुर्ण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी केले. शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील सहाय्यक कुलसचिव भगवान फड, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. राहुल खोब्रागडे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रमेश चौगुले, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनिषा असोरे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. जितेंद्र कुलकर्णी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशन हावळ, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितिन पाटिल, व्यवस्थापनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुयोग अमृतराव, सर्व विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.