धाराशिव (प्रतिनिधी)-खरीप हंगाम 2023 मध्ये जिल्ह्यातील 94% शेतकऱ्यांना आजवर पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळाली असून अग्रिम विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांना संपर्क साधुन त्रुटी दूर कराव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2023 मध्ये पिक विमा हप्ता भरलेल्या 5,60,352 शेतकऱ्यांपैकी 5,31,399 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी अग्रिम पिक विमा वितरित झालेला आहे. उर्वरित 28,953 शेतकऱ्यांना 19 डिसेंबर पर्यंत रक्कम अदा करण्याचा प्रयत्न असून विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकाशी संपर्क साधून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
4,063 शेतकऱ्यांचे सी.एस.सी. केंद्राकडे फेर तपासणीसाठी प्रस्ताव परत पाठविले आहेत, अशा शेतकऱ्यांनी फेर तपासणी करून घ्यावी. 7 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या 16,870 शेतकऱ्यांची क्षेत्र पडताळणी पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना 19 डिसेंबरच्या आत रक्कम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिल्या आहेत. या व्यतिरिक्त रु. 1,000 पेक्षा कमी रक्कम असलेल्या 7,222 शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकचे अनुदान आल्यानंतर रु. 1,000 प्रमाणे रक्कम अदा केली जाणार आहे. 798 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे, त्याची कृषी सहायकांना भेटून खातरजमा करावी. ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या नावासह कृषि सहायक यांच्याकडे उपलब्ध करण्याच्या व शेतकऱ्यांना या विषयात मदत करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना दिल्या असून त्रुटी पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे सूचित करण्यात आले आहे.