नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेली गटार व रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात येत असुन नगरअभियंत्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ही कामे ठेकेदार निकृष्ठ दर्जाचे करून विकासकामांचे तीनतेरा करत आहेत. नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालुन शहरात सुरू असलेली विकास कामे चांगल्या दर्जाचे व दीर्घकाळ टिकणारी करून घ्यावेत अशी मागणी होत आहे.
नळदुर्ग शहराला निकृष्ठ दर्जाच्या कामाचा एक कलंक लागला आहे. त्याची परंपरा आजही तशीच पुढे सुरू असल्याचे दिसुन येत आहे. शहरात विकासकामांसाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी सरकारने दिला आहे. मात्र केवळ निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे आजही शहरांतील रस्ते असोत किंवा आणखी कुठले काम त्या कामाचे वर्षभरातच तीनतेरा झाले आहेत.
सध्या नळदुर्ग शहरात नगरपालिकेच्या वतीने सात कोटी रुपये खर्चाची 32 कामे करण्यात येत आहेत. सध्या यातील रस्त्याची व गटार बांधण्याचे काम सुरू आहे. या कामांचा दर्जा अतीशय निकृष्ठ दर्जाचा आहे. सुरुवातीला नगर अभियंत्यांनी कांही कामे चांगल्या दर्जाचे करून घेतले मात्र सध्या होत असलेल्या कामांकडे नगरअभियंत्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. याचाच परीणाम म्हणुन ही कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे याहीवेळेस सरकारचा विकास निधी पाण्यात जाणार की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालुन सध्या शहरात जी रस्त्याची व गटार बांधणीचे काम सुरू आहे ती चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर झालेली कामे व त्या कामांचा दर्जा गुण नियंत्रक पथकाकडुन तपासुन घ्यावा अशीही मागणी होत आहे.
प्रत्येक काम अंदाजपत्रकानुसार व्हावे हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली कामे चांगल्या दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासकाची आहे. या 32 कामांमध्ये सभागृह व संरक्षक भिंत बांधण्याचेही कामे आहेत मात्र हे काम ठेकेदाराने अद्याप सुरू केले नाही ज्या कामात जास्त मलिदा मिळतो ती कामे ठेकेदार पोट गुत्तेदारांकडुन करून घेत आहे. वास्तविक पाहता सभागृह तसेच संरक्षक भिंत बांधण्याचे कांमही सुरू होणे गरजेचे होते. ही कामे अद्याप का सुरू झालेली नाहीत याची चौकशी होणे गरजेचे आहे.