धाराशिव (प्रतिनिधी)- सरपंच व सदस्य यांना मानधन, भत्ता वेळेवर देण्यात यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये दोन सदस्य सरपंचामधून घेण्यात यावेत, रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव तालुक्यातील सरपंच आक्रमक झाले आहेत. सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंचांनी दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील 622 ग्रामपंचायती बंद असून, ग्रामीण भागातील लोकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवार दि.19 डिसेंबर घेण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरपंच व सदस्य यांना जे मानधन व भत्ता दिला जातो, तो वेळेत वितरित करण्यात यावा. ग्रामपंचायत कॅम्युटर ऑपरेटर यांना सरकारी योजना व टेक्निकल प्रशिक्षण देण्यात यावे. सरपंचांना पंचायत समिती स्तरावर बैठक किंवा बसण्यासाठी हॉलची व्यवस्था करण्यात यावी. डीपीडीसी व जिल्हा परिषदेचा निधी ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात यावा. दुष्काळी स्थिती लक्षात घेवून रोजगार हमीच्या मंजूर कामासाठी दोन वेळेस करण्यात आलेली जिओ टॅगची अट शिथील करण्यात यावी. राज्य सरपंच संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सुजित हंगरगेकर, विनोद बाकले, सुनिल गरड, अभिजित पाटील, अनिरूध्द दुधभाते, अविनाश चव्हाण, सुधीर भोसले, बालाजी पवार, नागेंद्र पाटील, गोदाबाई शेळके, बळीराम कांबळे, देवकन्या मोरे, सुलभा खडके, निर्मलाताई चंदणे, मिरा हणमंते, जिजाबाई माने, शारदा भोसले, दत्तात्रय काशीद, विनोद थोडसरे, हनुमंत झांबरे, अमोल पवार, गोविंद हरकर, शोभा पाटील, मोहन सातपुते, कल्याणी लोमटे, लता मुळे, संतोष वडवले, रुक्मीण सपकाळ, राहुल भोसले, अमर शिनगारे, सुरेश नाईकनवरे, महादेवी भोसले आदींसह सरपंच, उपसरपंच, आजी- माजी सदस्यांची स्वाक्षरी आहे.


 
Top