धाराशिव (प्रतिनिधी)- ऐन सणासुदीच्या काळात धाराशिव शहरातील पथदिवे बंद असल्याने शहर काळोखात आहे. याकडे राज्य सरकारसह जिल्हा व नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे मंगळवारी (दि.7) शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नपच्या खांबावर कंदील लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकार व प्रशासनाचा निषेध केला. पथदिवे सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शहरात जवळपास 250 डीपी आहेत. या डिपीवरून पथदिव्यांना वीजपुरवठा केलेला आहे. शहरात जवळपास 10 हजार पथदिवे असून, त्यापैकी जवळपास 30 ते 40 टक्के पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. हे पथदिवे सुरू करण्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तर पालिकेचे कर्मचारी त्या पथदिव्याचे (एलईडी) फक्त कार्बन काढून तात्पुरती मलमपट्टी करीत आहेत. या कामासाठी पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ असून फक्त दोनच कर्मचारी आहेत. सध्या पालिकेकडे एकही एलईडी शिल्लक नाही. नवीन पथदिवे बसविण्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. पथदिव्यांचा पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीला पालिका तीन ते साडेतीन कोटी रुपये देणे असल्याचे सांगण्यात येते. शहराच्या काही भागात 24 तास पथदिवे सुरू असतात तर बहुतांश भागातील पथदिवे रात्रीही बंदच असतात. त्यामुळे धाराशिव शहरातील नागरिकांना अंधाराचा सामना करीत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आंदोलनात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, प्रवीण कोकाटे, सुरेश गवळी, नितीन शेरखाने, प्रदीप घोणे, दीपक जाधव, पांडू भोसले, संकेत सूर्यवंशी, अभिराज कदम, अफरोज पीरजादे, नवज्योत शिंगाडे, मुजीब काझी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.