धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ उपायोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी राष्टवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.अन्यथा येत्या आठ दिवसात लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुरुवारी (दि.14) दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात श्री दुधगावकर यांनी म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये 22 मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील खरीपामधील सोयाबीन, मूग, उडीद, मका या पिकांचे जवळपास 80 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यातच जिल्ह्यामध्ये पावसाच्या 102 दिवसांपैकी 30 दिवसच पाऊस पडला आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये उरलेल्या 17 दिवसांमध्ये 92 टक्के पावसाची उणीव कशी भरून निघणार याची चिंता शेतकयांना लागली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये 27 शेतकयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या कांद्याचे 15 कोटी रुपये, सततच्या पावसाचे शंभर कोटी रुपये, गारपीटीचे सन 2022 चा सरसकट पिक विमा जवळपास 328 कोटी पेक्षा जास्त अनुदान, जिल्ह्यातील 24 दिवस खंड वृष्टीमुळे 57 महामंडळातील शेतकयांना सरसकट अग्रीम रक्कम 25 टक्के मिळाली नाही. महात्मा फुले प्रोत्साहन योजनेतील जवळपास 1666 शेतकयांचे अनुदान अद्याप उपलब्ध झालेले नाही, ते मिळावे, दूध उत्पादक शेतकयांना एफआरपीप्रमाणे भाव मिळावा, टेंभुर्णी-लातूर महामार्गाचे चौपदरीकरण काम मंजूर करावे, येडेश्वरी मंदिर ते हायवेपर्यंतचा रस्ता नवीन करावा, भूविकास बँकेचे 30 वषार्पासून 2 हजार शेतकयांचे थकीत कर्ज माफ करावे, जिल्ह्यामधील मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षांमध्ये हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विकास कामासाठी शंभर कोटीवरील निधी मागील तीन महिन्याच्या कालावधीत उपलब्ध झालेला नाही. कृषी विभागातील पोखरा व इतर योजनेतील 30 कोटी रुपये मिळालेले नाहीत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील रस्ते दुरुस्त करावेत, ग्रामीण भागातील शेतीला लागणारी वीज उपलब्ध करावी, महावितरण कंपनीतील सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कामगार व कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या गोष्टीची उपायोजना करून येत्या आठ दिवसात धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात श्री. दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top