परंडा (प्रतिनिधी)- निवडणूक ही लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही पारदर्शकपणे सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन प्रभारी तहसीलदार उत्कर्षा जाधव यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या नवीन मतदान नोंदणी शिबिरामध्ये व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, जिल्हा परिषदेचे निवडणूक प्रक्रियेत मध्ये सहभागी असलेले बीएलओ गवळी, प्रा.विजय जाधव उपस्थित होते. यावेळी गवळी यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते व विद्यार्थी हे निवडणूक प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाचा टप्पा आहे हे आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले .
तहसीलदार उत्कर्षा जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या विधानसभा लोकसभा या निवडणूक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोग सध्या देशांमध्ये महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यां साठी नवीन मतदान नोंदणी शिबिरे आयोजित करत आहे.महाविद्यालयातील विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे शिबिरे आयोजित करण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.तेव्हा विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर 6 भरून महाविद्यालयांमध्ये आपापल्या शिक्षकाकडे तो जमा करावा किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या गावी फॉर्म भरला असेल तर त्याची माहिती संबंधित प्राध्यापकाकडे द्यावी किंवा बीएलओ यांच्याकडे तशी नोंद करावी.या कार्यक्रमासाठी प्रा सौ कीर्ती पायगन (नलवडे ) प्रा प्रतिभा माने प्रा तानाजी फरतडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर प्रा. विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .