धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यामध्ये स्वतः लक्ष देऊन नागरी समस्यांची सोडवणूक करण्याबाबत नगर परिषद प्रशासनाला अवगत करावे, अन्यथा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी घाणीमुळे डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होऊन डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून शहरात जंतुनाशक औषध व धूर फवारणी करणे गरजेचे आहे. अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राजाभाऊ पवार, प्रदीप घोणे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, अक्षय ढोबळे, राणा बनसोडे, नितीन शेरखाने, गणेश असलेकर, गणेश खोचरे, रवी वाघमारे,पंकज पाटील, बंडू आदरकर, सिद्धेश्वर कोळी,विजय ढोणे,पांडुरंग भोसले, नाना घाटगे,अजिंक्य राजेनिंबाळकर, अफरोज पीरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद, नंदू माने, राम साळुंके, गणेश साळुंके, रुपेश शेटे, महेश लिमये, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिकांची स्वाक्षरी आहे.