धाराशिव (प्रतिनिधी)- वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातून पावसाअभावी खरीप पिकच वाया गेल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे .मराठवाड्यातील बहुतांश तालुके गंभीर दुष्काळाने होरपळत आहेत .जून ते ऑगस्ट या कालावधीतील प्रजन्य तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने संपूर्ण मराठवाडा तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी स्वतंत्र मराठवाडा संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड रेवण भोसले यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

     मराठवाड्यात झालेल्या पावसाच्या मोठ्या तुटीमुळे यंदा खरीप हंगामातील 50 टक्के पेक्षा कमी उत्पादन होणार आहे. या विभागातील पीक परिस्थिती धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मराठवाड्यात यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 43% कमी झाला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक हातातून गेल्यात जमा आहे. शेतीचे उत्पन्न बुडालेले व पिण्याचे पाणी आटलेले अशा स्थितीत या विभागातून मोठे स्थलांतर होण्याची भीती आहे. दुष्काळाचे केवळ आर्थिकच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणाम सरकारने समजून घेतले पाहिजेत. मराठवाड्यात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळ तसेच आर्थिक संकटात सापडणारा शेतकरी आत्महत्या करत आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे व शेतकऱ्यांना दिलासा देणे तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन तातडीने करणे अत्यंत आवश्यक आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळवून देण्यासाठी कृषी ,महसूल खात्याबरोबरच इतर यंत्रणांची मदत घेऊन  तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात तसेच मोठ्या प्रमाणात कामे काढून शेतकरी, शेतमजूर व तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणीही ॲड भोसले यांनी केली आहे.


 
Top