धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व आमदार व खासदार हे जाहीर भाषणात जनतेचा कळवला व पुळका असल्याचे दाखवतात आणि आढावा बैठकीत उपस्थितीत राहून जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे मांडत नाहीत. त्यामुळे हे सगळे नाटक केवळ चमकोगिरीसाठी आहे. लोकांनी आमदार खासदार यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे आढावा बैठकीला हजर का राहिले नाहीत याचे उत्तर द्यावे अन्यथा पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी करून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या राजकीय धास्तीमुळेच लोकप्रतिनिधी बैठकीला येत नाही का? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आढावा बैठकीला सत्ताधारी भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. या मुद्यावर शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला आहे. आढावा बैठकीचे प्रशासकीय निमंत्रण दिल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी यांनी करीत आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेला सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंके, सुरज साळुंके, तालुका प्रमुख अजित लाकाळ उपस्थितीत होते.
डॉ. सावंत यांच्या राजकीय घोडदौडमुळे त्यांची भीती आहे. कारण तेरणा काही दिवसात चालु होणार आहे. त्यामुळे काही लोकप्रतिनिधीला राजकीय अस्तित्वाची भीती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आढावा बैठकीला पाठ फिरवीत आहेत. केवळ निषेध व पोकळ आरोप करुन विकास होत नसतो असा आरोप ही दत्ता साळुंके व सुरज साळुंके यांनी केला आहे.
पालकमंत्री सावंत यांची अमित शहा यांच्याशी भेट
रेल्वे भूमिपूजन कोनशीलेवर शेजारील बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत याचे नाव होते. मात्र पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचे नाव आमदार म्हणून सुद्धा नव्हते, एक प्रकारे डॉ सावंत यांचे राजकीय अस्तित्व अमान्य करण्याचा हा प्रकार होता. कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून आम्ही शांत होतो मात्र याची दखल मंत्री सावंत यांनी घेतली असुन पुणे येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत याची तक्रार व चर्चा झाली असेल अशी माहिती अनिल खोचरे यांनी दिली.