तुळजापूर (प्रतिनिधी)-पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असताना अद्याप एकही दमदार पाऊस पडला नाही. तालुक्यात हेक्टर क्षेत्रात ऊस असून पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, वजनात घट येऊ लागली आहे. परिणामी यंदा येऊ घातलेल्या साखर कारखान्याचे हंगाम संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
.तालुक्यातील शेती ओसाड पडलेली आहे. तालुक्यातील लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पात पाणी साठा झालेला नाही. कंचेश्वर, श्री तुळजाभवानी सह खाजगी गुळ कारखाने तालुक्यात आहेत.तुळजापूर तालुक्यात मागील दोन वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडल्याने जलसंधारण कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने 5928 हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली होती. तुळजापूर तालुक्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेल उचक्या देऊ लागलेत. ओढे-ओहोळ अद्याप
वाहिलेले नाहीत. त्यामुळे सध्या आहे त्या क्षेत्रात सुमारे 200 हेक्टर ऊसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
यंदा वजन घटणार
यंदाच्या पावसाळ्यात अद्याप पाऊस न झाल्याने ऊसवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही. उसाची वाढ खुंटलेली आहे. कृत्रिम पाण्यावर म्हणावी तशी उसाची वाढ होत नाही. यामुळे उसाचे वजन घटणार आहे. याचा ऊस गाळप हंगामावर विपरीत परिणाम होणार असून, साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवणार आहे. अगोदरच अडचणीत असणार्या साखर कारखान्याच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे. पाण्याअभावी ऊस पीक वाळून जाऊ लागले आहे.
कधी पाऊस पडेल याकडे शेतकर्यांचे डोळे
पावसाअभावी जनावरांच्या चार्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हळूहळू निर्माण होत आहे. पावसाअभावी भाजीपाला दरात दुपटीने वाढ झाली आहे.
वजनात मोठी घट होणार - कृषीअधिकारी अद्वेत मुळे
प्रारंभी दीड महिना पाऊस लांबल्याने ऊस कांड्यातील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे वजन फारच घटुन रिकव्हारी कमी होणार आहे. सध्या ऊस वाळुन पांढरा पडला आहे अशी माहिती कृषी अधिकारी अद्वेत मुळे यांनी दिली.