धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून 100% कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिक्षक अभियंता महावितरण यांना दिल्या आहेत. तसेच मुख्य अभियंता महावितरण यांना देखील नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस धाराशिवच्या दौर्‍यावर आल्यानंतर याबाबत चर्चा झाली होती व आढावा देखील घेण्यात आला होता.

राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषीक्षेत्रासाठी सुमारे 22% वापर प्रामुख्याने कृषी पंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी होतो. या योजनेंतर्गत सन 2025 पर्यंत एकूण कृषी वापरापैकी किमान 30% कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व कृषी फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे. कृषी फिडरच्या सौर ऊर्जीकरणामुळे शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे शक्य होणार असून यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जमीन भाडेतत्त्वावर दिल्यास यातून देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 


1 लाख 25 हजार हे्नटरी भाडे मिळणार! 

जिल्ह्यात 94 वीज उपकेंद्र असून 323 कृषी फिडर आहेत. या फिडरचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी  3485 एकर जमीनीची आवश्यकता आहे. निर्धारित निकाषा प्रमाणे एवढी शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे इच्छुक शेतकर्‍यांची यादी तयार करण्याच्या सूचना महसुल विभागाला देण्यात आलेल्या आहेत. शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी रु.1,25,000/- वार्षीक भाडेपट्टा म्हणून देण्यात येणार असून वार्षीक भाडेपट्टा दरावर प्रतीवर्षी 3% प्रमाणे वाढ करण्यात येणार आहे. तसेच या योजनेपेक्षा जास्त उत्पन्न देवू न शकणार्‍या जमीनी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी यासाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


 
Top