धाराशिव (प्रतिनिधी) - यावर्षी येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामास 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांनी आज येथे सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर, सुभाष कोळगे, बुबासाहेब जाधव, प्रा. डॉ.सतिश कदम, विवेक भोसले, मुरलीधर होनाळकर, भाऊसाहेब उमाटे आणि अरुण पवार, मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे जिल्हा अध्यक्ष युवराज नळे, अॅड. महेंद्र देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक, गणेश वाघमारे, रविंद्र शिंदे, राजाभाऊ करांडे, शीला वसंत उंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑडियो जिंगल्स तयार करावेत, घोषवाक्य तयार करावेत तसेच माहिती पट सादर करण्याचे नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन जनसामान्यांना मुक्ती संग्राम काय होता याबाबत माहिती मिळेल. वनविभागाने 75 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांनी केल्या.


 
Top