धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रिया सदृढ आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रियेत सर्वांचा समावेश असावा आणि एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने अधिकारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे म्हणाले.

आज या निमित्ताने जिल्हाधिकारी स्वत: बँक कॉलनी येथे विठ्ठल गंगावणे यांच्या घरी जाऊन येथील नवमतदार आणि महिला मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित केले तसेच मतदार नोंदणी अर्जही भरुन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, मतदार नोंदणी अधिकारी गजभार शंकर, पवन तावरे आदी उपस्थित होते.

 मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) हे प्रत्येक घरोघरी जाऊन 18 वर्षावरील सर्व नागरिकांची मतदार यादीत नोंद घेण्याचे काम करणार आहेत. तसेच महिला मतदारांचा मतदार यादीत जास्तीत जास्त समावेश करुन त्यांचा निवडणूकीत सहभाग वाढविण्याचे काम हे मतदार नोंदणी अधिकारी करणार आहेत. 


 
Top