उमरगा (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांनी आपले धेय्य ठरविले पाहिजे. अभ्यास,शिक्षण व इच्छित ध्येयासाठी प्रयत्न हे महत्वाचे असून यशाचा परिणाम आपल्यावर होतो. काय करायचे काय नाही याची समज यशामुळे येते. बुद्धी कौशल्य वापरले तर काहीही साध्य करता येते मेहनतीच्या जोरावर आपली किंमत आपणच वाढवावी लागेल असे मत संभाजी नगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.
उमरगा येथे रविवारी (दि.2) ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व ज्ञानज्योती पुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे, अजित पिंगळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी अजित लाकाळ, विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, पंढरीनाथ कोणे, अभिमान खराडे, विलास भगत, अविनाश माळी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई सुर्यवंशी, महाराष्ट्र चँपीयन तथा कुस्ती मार्गदर्शक धनराज भुजबळ, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे, प्रगतशील शेतकरी अॅड. अमर पवार यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उमरगा तालुक्यातील 100 टक्के गुण मिळवलेल्या कु. ऋतुजा राजेंद्र मंडले, कु. सृष्टी शंकर बिराजदार व कु. समृद्धी सतीश औरादे यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर लोहारा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. ज्योती बाबुराव शिंदे हिस 5 हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थितीतून ज्योती बाबुराव शिंदे या मुलीने 87.80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिला 5 हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश अचींतलवाड तर आभार संदीप जगताप यांनी मानले.