धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा धरणाच्या कालवा दुरुस्तीसाठी रु. 3.41 कोटी निधी मंजूर झाला असून अनेक वर्षापासून चा प्रलंबित विषय मार्गी लागला आहे. तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध असूनही अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती न झाल्याने कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडता येत नव्हते. ठाकरे सरकारच्या काळात अनेक वेळा मागणी करूनही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. या अनुषंगाने सतत पाठपुरावा सुरु होता. शुक्रवार दि. 9/06/2023 रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेवून संबंधित अधिकार्‍यांना बोलावून प्रत्यक्ष नस्ती वर स्वाक्षरी घेतली होती. आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

तेरणा प्रकल्पावरील डाव्या व उजव्या कालव्याची एकूण लांबी 32 कि.मी. असून याद्वारे तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी व भंडारवाडी या गावांतील 1652 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी  दि. 24.06.2021 तेरणा मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरुस्ती बाबत दुरुस्ती बाबत अधिकार्‍यांना निर्देश दिले होते, मात्र प्रत्यक्षात यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. बंद पाईपलाईन द्वारे थेट शेतात पाणीपुरवठा करण्याचा पथदर्शी प्रकल्प काही तांत्रिक दोष आढळल्यामुळे बंद आहे. त्यामुळे त्याद्वारे सिंचनास विलंब होत असल्याने कालवा दुरुस्त करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

कालवा दुरुस्तीसाठी आता निधी उपलब्ध झाला असून तात्काळ दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बंद पाईपलाईन द्वारे थेट शेतात पाणीपुरवठा करण्याचा पथदर्शी प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.


 
Top