धाराशिव / प्रतिनिधी-

गेल्या अनेक वर्षापासून महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी धाराशिव जिल्ह्यातील वीर शैव लिंगायत समाजाची मागणी होती. यासाठी सुयोग्य जागेची चाचपणी सुरू होती. आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी याबाबत पुढाकार घेत काल महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गा लगत उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी केली व या ठिकाणी सुसज्ज उद्यानासह अश्वारुड पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 महात्मा बसवेश्वरांनी महिलांवरील अत्याचार व उच्च-नीच भेदभाव संपवण्यासाठी मोठा लढा दिला होता. समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. लिंग, जात, सामाजिक स्थिती या गोष्टींचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यांचे आदर्श विचार व कार्य सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून जिल्ह्यात त्यांचा एकही अश्वारूढ पुतळा नसल्याने पुतळा उभारण्याची समाजाची अनेक दिवसांची मागणी होती. 

 नळदुर्ग शहराला ऐतिहासिक महत्व असून गोलाई येथे सोलापूर –हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग लगत उपलब्ध असलेल्या शासन मालकीच्या जागेवर सुसज्ज उद्यानासह महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा आश्वारूड पुतळ्यासह ध्यान केंद्र, बागबगीचा व सुशोभीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नळदुर्ग शहर व समाजातील प्रमुख व्यक्तींसमवेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काल या जागेची पाहणी केली व अधिक्षक अभियंता श्री. बी. एम. थोरात यांना दोन आठवड्यात वास्तुविशारद तज्ञांच्या सहकार्याने अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. याबाबत नागरिकांच्या काही सूचना अथवा संकल्पना असल्यास त्या mahatmabasweshwarstatue@gmail.com या इमेल वर पाठवाव्यात, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 

 यावेळी ॲड. दिपक दादा आलुरे, वसंतराव वडगावे, संजय बताले, दत्तात्रय कोरे, महालिंग स्वामी, बसवराज धरणे, सुभाष कोरे, निलय्या स्वामी, संगमेश्वर व्हणाळे, दयानंद स्वामी, राजू पिचे, संतोष वाले, खंडेशा कोरे, बाबुराव मुळे, मल्लिनाथ बाळुरकर, सागर कलशेट्टी, राजू तोग्गे, महादेव सालगे अप्पासाहेब पाटील, दयानंद मुडके, सागर मुळे, भीमाशंकर बताले, मुन्ना वाले, अमोल मुळे, शिवय्या स्वामी, वीरेंद्र पाटील प्रकाश बेडगे,lयांच्यासह नागरिक उपस्थित होते.


 
Top