उस्मानाबाद / प्रतिनिधी
जिल्ह्यात महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता शेतीला विज पुरवठा करणारे फीडर, ट्रान्सफार्मर नियमबाह्य व बेकायदेशीर पध्दतीने वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही लेखी आदेश नसताना विज देयके वसुलीच्या नावाखाली बंद केली जात आहेत. सध्या रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांकडून सुरळित वीज पुरवठ्याची मागणी होत असून ट्रान्सफार्मरवर अतिरीक्त भार असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असून शेतीपिकाचे नुकसान होत आहे. शेतीपंपाचे कनेक्शन बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांच्या व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैयक्तिक अधिकारी जबाबदार धरुन महावितरणच्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सुचना केल्या.