उस्मानाबाद /प्रतिनिधी-  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली जल व भूमी व्यवस्थापन विभाग व स्वयम शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांसाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी महिलांना पाणलोट क्षेत्र व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.डॉ.नितीन पाटील (विभागप्रमुख, जल व भूमी व्यवस्थापन विभाग),श्री. प्रदीप गारोळे (संचालक, यशदा पुणे) व श्री. प्रकाश पाटील (पाणलोट प्रशिक्षक) यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसराचे संचालक, प्रोफेसर डॉ.डी.के. गायकवाड यांनी भूषविले. 

यावेळी उपस्थितांना प्रा.डॉ. नितीन पाटील यांनी "पंचजकार व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शन केले. पाणलोट व्यवस्थापनामध्ये सर्वच नैसर्गिक संसाधने जसे जल, जमीन, जंगल, जनावर व जनसंख्या यांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

धाराशिव जिल्हा हा कृष्णा व गोदावरी नदी खोऱ्याच्या रीज लाईन वरती वसलेला असल्यामुळे येथील पावसाचे पाणी दोन्ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये वाहून जाते व त्यामुळेच येथे पंच जकार व्यवस्थापन आवश्यक असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

धाराशिव हे नाव देखील धारा म्हणजेच पाऊस आणि शीव म्हणजेच गावची सीमा म्हणजेच दोन्ही बाजूना होणाऱ्या पावसाच्या रनऑफ मुळे दिले गेले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या जिल्ह्यात 750 मिमी पाऊस पडतो म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रावरती एवढा पाऊस झाल्यास 75,00,000 लिटर पाणी आपणास निसर्गाकडून मोफत मिळते व या पाण्याचे संवर्धन केल्यास त्यापासून या भागाचा शाश्वत विकास साधता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

जल व भूमी व्यवस्थापन विभागात पंच जकार व्यवस्थापन विषयीचा दोन वर्षीय पद्वियुत्तर अभ्यासक्रम सुरु असून सोबतच एस.एस.पी. या संस्थेसोबत संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा संदेश 100 गावांमधून आलेल्या 100 महिलांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात पोहोंचेल असा आशावाद प्रा.डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केला. यानंतर उपस्थित महिलांच्या प्रश्नांचे निरसन डॉ. पाटील यांनी केले. यानंतर श्री. प्रदीप गारोळे व श्री. प्रकाश पाटील यांनी प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वत्र या प्रशिक्षण कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.

 
Top