उस्मानाबाद /प्रतिनिधी -

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे पालन करायचे आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व प्रशासकीय कार्यालय प्रमुखांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून आदर्श आचार संहितेचे उल्लघन होणार नाही. तसेच ग्रामीण व शहरी भागात राजकीय व्यक्ती,पक्ष यांची पोस्टर्स किंवा बॅनर सार्वजनिक ठिकाणी असतील तर ते आज 3.00 वाजेपर्यंत काढून टाकुन उत्कृष्ट व्हिडीओ जिल्हा मुख्यालयातील निवडणूक विभागाकडे पाठवून द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आयोजित आढावा बैठकीत आज दि. 30 डिसेंबर रोजी केले.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकी संदर्भात आज जिल्हा नियेाजन समितीच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उप जिल्हा निवडणूक अधिकारी शुभांगी आंधळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.ओम्बासे म्हणाले की, काल दि.29 डिसेंबर 2022 पासून या निवडणूकीची आचार संहिता लागू झाली आहे.कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीला शासकीय विश्रामगृह,निवास्थान उपलब्ध करून असणार नाही .तसेच मंत्री,खासदार व आमदार यांना कोणत्याही शासकीय नवीन कामांचे उदघाटन किंवा लोकार्पण करता येणार नाही या बरोबरच राजकीय व्यक्तींना कोणत्याही शासकीय वाहनांचा वापर करता येणार नाही. या बाबीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.  

 
Top