उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य मुंबई कामगार आयुक्त यांच्या निर्देशानुसार 14 नोव्हेंबर “बालदिन” या दिवसाचे औचित्य साधून दि. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर बालकामगार प्रथाविरोधी सप्ताहाचे करण्यात आले आहे.

 या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहूलक्षेत्र निश्चित करणे, जिल्ह्यातील विटभट्टी  येथे भेटी देवून तपासणी करणे आणि मालकांकडून किंवा चालकांकडून बालकामगार न ठेवण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेणे, जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन यांच्या बैठका घेऊन त्यांना सुधारीत बालकामगार अधिनियमाबाबत माहिती देणे, जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील व्यापारी संघटनांचे एकत्रित चर्चासत्र घेणे, बाल कामगार प्रथेविरुद्ध जिल्ह्यातील बाजारपेठ क्षेत्रात रॅली घेणे, सार्वजनिक ठिकाणी बालकामगार अधिनियमाबाबत जनजागृती करणे, जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना येथे बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टीकर किंवा पॉम्प्लेट तयार करुन प्रदर्शित करणे, जिल्ह्यातील औद्यागिक क्षेत्रातील सर्व मालक संघटनांची बैठक घेऊन तेथे बाल कामगार प्रथेविरुद्ध चर्चा करुन जनजागृती करणे आणि त्यांना बालकामगार कामावर ठेवू नये म्हणून सामुदायिक शपथ कार्यक्रम आयोजित करणे, बालकामगारांशी निगडित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामध्ये पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बालकामगार निर्मुलन कार्यक्रमात सामावून घेणे, जिल्ह्यातील सर्व शासकिय कार्यालयातील अधिकाऱ्यांना घरेलू कामगार म्हणून बाल कामगारांना न ठेवण्याबाबत आव्हान करणे, प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बाल कामगार प्रथेविरुद्ध संवेदनशील करण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन करणे  आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

 तसेच बाल व किशोरवयीन कामगार  (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय किंवा प्रकियेत  कामावर ठेवणे तसेच  14 वर्षे पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने किंवा नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर, ठेवल्यास, त्यांस सहा महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रुपये ते  50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन  मुलांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.


 
Top