उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

खरीप हंगाम 2020 मधील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्या बाबत कायदेशीर लढ्यात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बजाज अलायंन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुनावणी घेण्यापूर्वी जमा करून घेतलेली 201 कोटी रुपयांची भरपाई जिल्ह्यातील 3, 47, 484 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. अजूनही उर्वरित 373.25 कोटी रुपये कंपनीकडून प्राप्त होणे बाकी आहे. त्या अनुषंगाने आपल्या आंदोलनावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीवर आर. आर. सी (महसुली वसुली) कार्यवाही करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले होते. यावर काय कार्यवाही सुरू आहे, याचा पाठपुरावा करण्यासाठी  आ.कैलास पाटील यांनी  राजेश देशमुख यांची पुण्यात भेट घेतली. त्यांना महसुली वसुली कार्यवाही गतिमान करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा केली.,

डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपनीच्या संपत्तीचा शोध घेऊन तातडीने नोटिसा काढण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगत शक्य तितक्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केले आहे.  ही आपल्यासाठी समाधानाची बाब असून, पुढेही कार्यवाही पूर्ण होऊन रक्कम हाती येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले असत्याची माहिती अामदार कैलास पाटील यांनी दिली. 


 
Top