तुळजापूर / प्रतिनिधी-
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला असून शहरातील बाजारपेठ सजावटीच्या साहित्यांनी नटली आहे . तिर्थक्षेञ तुळजापूर येथील दिपावलीस देविजींच्या अभ्यंग स्नानाने प्रारंभ होतो. सोमवार दि.२४ रोजी नरकचतुर्थी दिनी पहाटे चार वाजता देविजींना अभ्यंगस्नान, पंचामृत स्नान विधी होणार आहे नंतर पहाटे ५.३०वा. धुपारती होईल. तसेच सांयकाळी कालभैरव मंदीरातुन भेंडुळी प्रज्वलित करून त्यांचे पुजन करुन कमान येथे भेडुळी शांत करून हा उत्सव संपन्न होणार आहे. नंतर देविजींना भाविकांच्या अभिषेक पुजा करण्यात येणार आहेत.
सध्या घरोघरी फराळ तयार करण्याचे कामे सुरु असुन तसेच खरेदी ही चालु आहे , छोट्या मुलांसाठी नवीन कपडे खरेदीसह साजसजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे . दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे कोंडमारा झालेल्या तुळजापूरकरांनी आता मोकळा श्वास घेतला असून सणवार दणक्यात साजरे करीत आहेत. दिवाळी सारख्या सणासाठी देखील जय्यत तयारी केली जात आहे. दिवाळीला आकाशकंदील , पणती , रांगोळी , सुगंधी उटणे , दिवाळी फराळासाठी किराणा दुकाने ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे . फटाक्यांची दुकाने लावली जात आहे . दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
नोकरदारांची जोरात तर बळीराजाची दिवाळी साधी !
यंदा नोकरदारांना बोनससह अन्य रक्कम शासनाने दिवाळी पुर्वी दिल्याने नोकदारांची दिवाळी जोरात असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तर यंदा दिवाळी जवळ येवुन ही दररोज पाऊस पडत असल्याने खरीप पिक हातचे गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी सणाचा उत्साह दिसुन येत नाही मिळालेल्या अतिवृष्टी अनुदानावर दिवाळी साधेपणाने साजरी करण्याची वेळ निसर्गाने अन्नदाता बळीराजावर आणली आहे.