समस्त पुजारी समाजाची मागणी
उस्मानाबाद / प्रतिनिधी-
अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार पोलिसांची नेमणूक करा तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समस्त गुरव समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. ‘
या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे श्री खंडोबाचे जागृत देवस्थान असून या मंदिराचे पुजारी वंशपरंपरागत गुरव समाजाचे आहेत, गुरव समाजाने आज शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती केल्यामुळे या गावातील काही समाजकंटकांना पोटशूळ उठले आहे, मागील २१ ऑगस्ट 2022 रोजी मंदिरात किरकोळ वादातून गुरव समाजातील दहा ते बारा पुजाऱ्यांना गावातील समाजकंटकांनी बेदम मारहाण करून जखमी केले, त्याची तक्रार नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे दाखल आहे,
अणदूर श्री खंडोबा मंदिरात कायमस्वरूपी किमान चार पोलिसांची नेमणूक करा तसेच दर रविवारी काढण्यात येणाऱ्या छबिना मिरवणुकीच्या वेळी किमान १० पोलिसांचा बंदोबस्त द्या, देवस्थान आणि गुरव समाजाची शेती बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा, पुजाऱ्यांना मंदिरातून हाकलून लावण्याचे प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा अश्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर पन्नासहून अधिक गुरव समाज बांधवांच्या सह्या आहेत.
अणदूर घटनेचा राज्यभरातील गुरव समाज बांधवानी निषेध करून, समाज कंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यात झालेल्या अखिल गुरव समाज संघटनेच्या बैठकीत अणदूर घटनेचा निषेध करून राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.