उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम लढयातील जाज्वल इतिहासाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या देखाव्यांसह गणेश मंडळाच्या ढोल, ताशा, लेझीम, टाळ व इतर पथकांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृतींचे सादरीकरण उस्मानाबाद शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्स वर्षी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शोभा यात्रा, स्मृती स्तंभांना अभिवादन, स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या कुटुंबीयांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  तानाजी सावंत व आ. राणाजगजितसिंह पाटील,  नितीन काळे,  सुरज साळुंके यांच्या हस्ते गौरव सत्कार करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली. सत्कारमूर्तींना मानाचा फेटा, मायेची शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सत्कारमूर्तींमध्ये जेष्ठ स्वातंत्रसेनानी श्री. भास्करराव नायगावकर, दौलतराव माने यांच्यासह स्वातंत्रसेनानींच्या पत्नीचा समावेश होता.

 शोभा यात्रेमध्ये श्री श्री रविशंकर विद्यालय, तेरणा माध्यमिक विद्यालय, भाई उद्धव पाटील कन्या प्रशाला, सरस्वती विद्यालय, भारत विद्यालय, समता माध्यमिक, आर.पी.कॉलेज, छत्रपती शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद शाळा, जिवनराव गोरे विद्यालय, शरद पवार हायस्कुल, आर्य चाणक्य, शम्सुलउलुम शाळा, जिल्हा स्काऊट गाईड पथक सहभागी झाल्या होत्या. भारत मातेचा रथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा, एलईडी स्क्रीन वर मुक्ती संग्राम लघुपटाचे प्रसारण, खेळाडुंचे पथक, मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची बाजी लावणारे पहिले अशोक चक्र विजेते शहीद बचित्तरसिंह यांचा जीवनपट उलगडणारा चित्ररथ आदी देखावे सामील होते.

 जय मल्हार तरुण गणेश मंडळांचे देवी-देवतांच्या अवतारातील बालकलाकारांच्या सहभागासह लेझीम पथकाचे विलोभनीय सादरीकरण, समता मध्यवर्ती चे मुला - मुलींचे दिमाखदार ढोल पथक, साईराज तरुण गणेश मंडळाचे लक्षवेधी लेझीम व महिलांचे टाळ पथक, ग्रीन समताचे मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या लग्नाचे हुबेहूब सादरीकरण, समर्थ राजा गणेश मंडळाचे उर्जान्वीत ढोल पथक यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे सादरीकरण करून शहरवासीयांची मने जिंकली.

 उत्कृष्ट देखावे व सादरीकरणाला आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पारितोषिक देण्यात येणार असून यासाठी परीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार रवी केसकर, आकाशवाणीचे दौलत निपाणीकर व आनंद वीर सर यांनी काम पहिले. 

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज जाधव, नवनाथ सोलंकर, नाना घाडगे, स्वप्नील शेटे, सुजित साळुंके, मनोगत  शिनगारे, भालचंद्र कोकाटे  , नेताजी पाटील, ॲड.मिलींद पाटील,ॲड.व्यंकटराव गुंड, ॲड.खंडेराव चौरे, सतिष दंडनाईक, राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, सुनिल काकडे, युवराज नळे, अभय इंगळे, प्रदिप शिंदे, राहुल काकडे, देवा नायकल, अभिराम पाटील, मोहन मुंडे, मेसा जानराव, यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


 
Top