उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जंतनाशकाची गोळी सर्वांसाठी मोफत व प्रभावी असल्याने जिल्हयातील सर्व पात्र  1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना याचा लाभ देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग इत्यादींनी समन्वयाने मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनि केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, पोलीस उपाधिक्षक ए.डी. शेख, डॉ.आय. जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनीधी के. मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकूडे, प्राथमिक शिक्षणाचे उपशिक्षणाधिकारी उध्दव सांगळे, माध्यमिक शिक्षणाच्या उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, महिला व बाल कल्याणचे कार्यक्रम अधिकारी(प्रतिनिधी) शरद माळी, डॉ. दीपक मेंढेकर, डॉ. विवेक होळे, डॉ. अतुल घोगरे, डॉ. गजानन परळीकर, डॉ. उज्वला कळंबे, हेमंत पवार, कलीम शेख, रंजना राठोड, रेखा मुळे आदी उपस्थित होते.       

 राज्यात दि. 25 एप्रिल ते 2 मे 2022 या कालावधीत राष्ट्रीय जंतनाशक मोहिम (National Deworming Campaign) चे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील सर्व 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा, अनुदानीत शाळांमधून आणि समुदाय स्तरावर सर्व अंगणवाडीमधुन कोव्हीड- 19 मार्गदर्शक सुचनांचे अवलंब करुन आशा व अंगणवाडी सेवीका यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.

 श्री. दिवेगावकर  म्हणाले, मोहिम राबवित असताना आरोग्य कर्मचारी व इतर अनुषंगीक कर्मचारी हे साढे चार लाख लाभार्थींना लाभ देणेसाठी जवळपास प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहेत तर या मोहिमेच्या प्रभावी अमंलबजावणी सोबतच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यवाही अनुसरावी अशा सूचना देखील श्री. दिवेगावकर यांनी दिल्या.

  प्रस्ताविक करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. बोडके म्हणाले की, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा उद्देश हा 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी चावून खाण्यासाठी देवून त्याचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. तसेच जंतसंसर्ग थांबविणे करीता हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, पायात चपला / बुट घालणे, निर्जंतुक व स्वच्छ पाणी पिणे, अन्न व्यवस्थित शिजवुन खाणे, निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धूणे, नखे नियमित कापणे, व शारीरीक स्वच्छता ठेवणे इत्यादी बाबत आरोग्य शिक्षण देणे हा जंतसंसर्ग टाळण्याचा उपाय असल्याचे सांगून जंतनाशक गोळीच्या सेवनाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे उपस्थितांना सांगीतले यामध्ये जंतनाशकामुळे रक्तक्षय कमी होणे, आरोग्य सुधारणे, बालकांची वाढ भराभर होणे, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढणे, शाळेतील उपस्थित वाढणे, बालकाची आकलन शक्ती सुधारणे, दिर्घकाळ काम करणे व अर्थाजनाची क्षमता वाढणे इत्यादी बाबींसाठी मदत होणार आहे. मोहिमेसाठी ग्रामीण भागातील 3,12,812 तर शहरी भागातील 1,38,734 असे जिल्हयातील एकूण 4,51,546 लाभार्थींना जंतनाशक गोळी देवून जंतापासून संरक्षीत करण्यात येणार असल्याचे डॉ. बोडके यांनी सांगीतले.या बैठकीस आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top