उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद जिल्हयात  सण आणि उत्सव  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्यामुळे जिल्हयात आज दि.28 एप्रिल ते 12 मे 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) जमाव व शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात  येत असल्याचे अपर दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे. दि. 28 एप्रिल 2022 रोजी शब-ए-कद्र (बडीरात), दि. 29 एप्रिल 2022 रोजी रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार (जम्मतुलविदा), दि. 01 मे 2022 महाराष्ट्र दिन, दि. 03 मे 2022 रोजी अक्षय तृतिया, परशुराम जयंती,महात्मा बसवेश्वर जयंती, दि. 03 मे 2022 रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) चंद्र दर्शनावर अवलंबून एक दिवस मागे पुढे साजरी होणार आहे,

उस्मानाबाद जिल्हयात ग्रामिण आणि शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा,जत्रा,ऊरूस लहान मोठया स्वरुपात साजरे होणार आहेत, सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्टया सत्ताधारी आणि  विरोधक यांच्यात एकमेका विरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरू आहेत, तसेच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच विविध पक्ष/संघटना तसेच शेतकरी यांचे वतीने त्यांचे विविध मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, उपोषण, आत्मदहन, निर्देशने व रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात होणारे धार्मिक सण, उत्सव व आंदोलनात्मक कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हयात शांततेत पार पाडण्या करीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. 28 एप्रिल 2022 रोजीचे

00.01 पासून ते दि. 12 मे 2022 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी आदेश संपूर्ण  जिल्हयात जारी करण्याचे आदेश जारी केले आहे. पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांच्या अहवालावरुन जिल्हयाची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 घे कलम 37 (1) (3) प्रमाणे जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची खात्री झाली आहे.

  त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातुन उस्मानाबाद जिल्हयात दि. 28 एप्रिल 2022 रोजीचे 00.01 पासुन ते दि. 12 मे 2022 रोजी 24.00 वाजे पावेतो (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे,असेही या आदेशात म्हटले आहे.

 हा  आदेश  उस्मानाबाद जिल्हयातील दिनांक 01 मे 2022 रोजी होणा-या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी व सर्व ध्वजारोहणाच्या ठिकाणी लागू असणार नाही. शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत, लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तू बाळगणार नाहीत,कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत,दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत.आवेशी भाषणे,अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत.जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत,व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक अथवा मोर्चा काढता येणार नाही.असेही या आदेशात श्री स्वामी यांनी म्हटले आहे.

 
Top