उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद  जिल्ह्यासह शहरात मागील काही दिवसांमध्ये दरोडे, चोरी, लूटमार आशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली असून रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलिसांना या घटनांचा अद्याप उलगडा करता आलेला नाही. तपास यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे यात सुधारणा घडवून आणून, नागरिकांना भीतीच्या वातावरणातून मुक्त करता यावे, त्यांना निर्धोकपणे वावरता यावे, यासाठी पोलीस महासंचालक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी राज्याचे  गृहराज्यमंत्री  शंभूराजे देसाई यांच्याकडे 3 मार्चला प्रत्यक्ष भेटून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विनंती केली होती.

त्याअनुषंगाने ना. शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार मा. ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, अामदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनातील दालनात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी, पोलीस उपअधिक्षक यांनी ग्रुप कॉल करावेत, दैनंदिन रात्र गस्त पथक तैनात करावेत, ग्राम सुरक्षा यंत्रणा तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, नाकाबंदी सुरू करावी, पेट्रोलिंग नियमित सुरू ठेवावी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांचे दौरे वाढवावेत, अशा सूचना मा. मंत्रीमहोदयांनी दिल्या असल्याचे खा. ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर यांनी कळविले आहे.या बैठकीमुळे पोलीस यंत्रणा अधिक क्रियाशील होऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम करतील, अशी अपेक्षा आहे. चोरट्यांची दहशत पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी त्या उपाययोजना सरकार व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.

याप्रसंगी उपसचिव संजय खडके, अतिरिक्त महानिरीक्षक एम. राजकुमार, कक्ष अधिकारी अतुल गव्हाणे तसेच दूरदर्श प्रणालीद्वारे संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना व पोलीस अधिक्षक श्रीमती निवा जैन उपस्थित होते.

 
Top