उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार जिल्हयात असल्यामुळे भरीव आर्थिक विकास निधी मिळणे अपेक्षीत होते. परंतु असे कांही झालेच नाही. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग जिल्हयाच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असताना राज्य सरकार खर्चाचा ५० टक्के वाटा का उचलत नाही, राज्यातील इतर रेल्वे मार्गाच्या खर्चाचा ५० टक्के खर्च  अर्थसंकल्पात समावेश केला आहे. केंद्र सरकार ने या रेल्वे मार्गांसाठी आतापर्यंत ३२ कोटी रुपये दिलेत. राज्य सरकार का मदत करत नाही, असा सवाल भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, पिराजी मंजुळे, राजनाथसिंह राजेनिंबाळकर, दत्ता कुलकर्णी, अॅड. खंडेराव चौरे, अॅड. नितीन भोसले, पांडुरंग लाटे सर आदींची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना राणा पाटील म्हणाले की,   राज्यातील अनेक प्रकल्पांचा भाषणात उल्लेख झाला, मात्र उस्मानाबादकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, मराठवाडा वॉटर ग्रीड, महिला रुग्णालय विस्तारीकरण, तुळजापूर तीर्थक्षेत्राचा प्रशाद  योजनेमध्ये समावेश व टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पांचा साधा उल्लेखही झाला नाही.

राज्यात इतर ठिकाणी १०० खाटांच्या नवीन महिला रुग्णालये मंजूरीच्या घोषणा आज झाल्या, मात्र नितांत आवश्यकता असताना, अनेक वर्षाची मागणी असूनही उस्मानाबाद येथील महिला रुग्णालय विस्तारीकरणाचा सरकारला पूर्णतः विसर पडला. महिलांच्या आरोग्या विषयी महाविकास आघाडी सरकारची एवढी अनास्था अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून याहून अधिक अर्थसंकल्पावर काय बोलणार?

शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार निवडुन दिल्या नंतर ठाकरे सरकार यावर्षी तरी न्याय करेल, ही जिल्हावासियांची अपेक्षा पुन्हा एकदा फोलच ठरली. यावर उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचेच आहेत. हे सर्वजन त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ दिसतात व ही आपल्यासाठी मोठी  चिंतेची बाब आहे.


 
Top