शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने मान्यवर खासदाराच्या प्रमुख उपस्थितीत विविध जिल्ह्यामध्ये हे शिवसंपर्क अभियान घेण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यामध्ये खासदार लोखंडे यांना नियुक्त केले, त्यानी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला व पुढील काळात पक्षाचे धोरण काय असणार हे सांगितले. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन केलेल्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला, पक्षीय संघटना बळकट करण्यासाठी व भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पुर्वतयारी यानिमित्ताने करण्यात आली. मनुष्य नाही तर धनुष्य ही पक्षाची भुमिका स्विकारुन पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचा मानस यावेळी खासदार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तालुक्याच्या विविध गावामध्ये व शहरात बैठकाना उपस्थिती लावुन केलेल्या कामाची माहिती दिली. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे जिल्हाप्रमुख व नंतर आमदार झालेल्या कैलास पाटील यांनी स्वतःचे उदाहरण देत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्यास त्यांचीही पक्ष दखल घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार पाटील यानी व्यक्त केले.गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हा नारा घेऊन त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची असुन त्यासाठी कुणीही मागे राहणार याची काळजी शिवसैनिकानी घेतल्यास हे सहज शक्य असल्याचे मत आमदार पाटील यानी व्यक्त केले. जिल्ह्याचा विचार केला तर चार पैकी तीन आमदार व एक खासदार अशी शिवसेनेची शक्ती आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडुन आणण्यासाठी कोणतीही कसुर सोडली नाही, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यांना निवडुन आणणे हे आमच काम आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन तुम्हाला विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगुन 2024 च्या निवडणुकीत खासदारासह चारपैकी चार आमदार शिवसेनेचे असतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.