उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रजास्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा जिल्हयात आज उत्साहात पार पडला. जिल्हयातील सिंचनाचे क्षेत्र गेल्या  दोन वर्षात सुमारे सहा ते सात हजार हेक्टरने वाढले असून येत्या तीन वर्षात ते 25 हजार हेक्टर पर्यंत वाढविण्याचा मानस व्यक्त करून जिल्हयांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्नन करण्यास कंठीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.

 येथील मुख्य शासकीय ध्वजारोहनचा सोहळा श्री. तुळजाभवानी क्रीडा संकुलात त्यांच्या हस्ते पार पडला,त्यानंतर उपस्थिताना शुभेच्छा संदेश देताना श्री.गडाख बोलत होते.यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, प्रभारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,नगराध्यक्ष राजेनिंबाळकर, स्वातंत्र्य सैनिक ,अधिकारी, आणि कर्मचारी  व नागरिक उपस्थित होते.

 राज्य शासनाच्या दि. 30 जुलै 2021 च्या  शासन निर्णयाप्रमाणे पीक पाहणीची माहिती  भ्रमणध्वनीवरील नागरिकांच्या मोबाईल ॲप व्दारे नोंदवण्यात आली.या उपक्रमात उस्मानाबाद जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता गेल्या वर्षभरात जिल्हयातील 282 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. या शेतरस्त्यांचा 11 हजार 164 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आतापर्यंत जिल्हयात 325 किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत,असे सागून पालकमंत्री  श्री. गडाख म्हणाले राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयामध्ये 2 लाख 63 हजार 409  ई- फेरफार प्रणालीद्वारे नोंदणीचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.जिल्हयातील कोरोना संसर्गामुळे घरातील कर्ती व्यक्ती मयत झाल्याने एकल झालेल्या एकूण 535 लाभार्थ्यांना अर्थात विधवा, अनाथ बालकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्टीय वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ  सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले

  जिल्हयात कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्यांच्या  नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान प्रदान करण्याबाबतची  प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हयातील प्राप्त अर्जांच्या  छाननी अंती 1191 अर्ज  निधी वितरणाच्या कार्यवाहीसाठी शासनास सादर केले आहेत,असे सांगून श्री.गडाख यांनी  गेल्या दोन वर्षात जिल्हा नियोजन समितीने विविध सिंचन योजनांच्या कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे सुमारे 6000 ते 7000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, पुढील तीन वर्षांकरिता 25000 हेक्टर ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे चालू वर्षात  12  कोटी रुपयांच्या 102 कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे.

  श्री. गडाख म्हणाले की राज्यात केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. हे मिशन गावागावात यशस्वीपणे राबविण्यास ग्रामपंचायती आणि गावकऱ्यांची मेाठी जबाबदारी आहे. जिल्हयातील ग्रामस्थांनी हे जलजीवन मिशन योजना राबविणे,चालविणे, तिची देखभाल दुरूस्तीची करण्यासाठी पुढाकार घ्यावा.लोकामध्ये जनजागृती होऊन हे मिशन एक लोकचळवळ व्हावी अशी  अपेक्षाही त्यांनी  व्यक्त करून त्यांनी   जिल्हा वार्षिक योजनेच्या  21 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीतून जिल्हयातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी 1262 ऑक्सिजन बेड,263 आय सी यु बेड, 148 व्हेंटिलेटर, 1663 जंबो सिलेंडर, 789 छोटे सिलेंडर,9 युरा सिलेंडर,494 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स, 138 बायपॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या जिल्हयात 54 मेट्रीक टन क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता आहे.सध्या  सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एल.एम.ओ.टॅक आणि पी.एस.ए.प्लांटची कार्यपूर्तता प्रगतीपथावर आहे.जिल्हयातील ऑक्सिजनची निर्मिती आणि साठवण 98 मेट्रीक टन इतकी अतिरिक्त होईल.तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण  झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता,आता जिल्हयात तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

    जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 2021-22 मध्ये  जिल्ह्यासाठी  280 कोटी रुपये  इतका नियतव्यय मंजुर झाला आहे. एकूण मंजुर नियतव्ययापैकी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने 48 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. 2021-22 मध्ये अतिवृष्टीच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास शोध आणि बचाव कार्यासाठी नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत स्वयंचलित बोट खरेदी करण्यात आली आहे,असे सांगून पालकमंत्री   म्हणाले     जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  2022-23 करिता उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शासनाने कमाल नियतव्यय मर्यादा 191 कोटी  रुपये दिली होती. विशेष प्रयत्नामुळे 104 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी  मंजुर झाला आहे.त्यामुळे आता जिल्हयास एकूण अंतिम नियतव्यय  295 कोटी रुपये  मंजुर झाला आहे. आपला जिल्हा आकांक्षित जिल्हा असला तरी आपली शाश्वत विकासाकडे   वाटचाल सुरू आहे. यात शासनाबरोबरच जिल्हयातील सर्वंच घटकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे.आपल्या देशाची,आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या जिल्हयाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी जागरूक नागरिक  म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करू  या, अशी भावना व्यक्त करून श्री.गडाख यांनी जिल्हा वासीयांना प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  यानंतर पालकमंत्री गडाख यांनी अभ्यागतांसह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली.

 
Top