उस्मानाबाद/प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तहसीलचे अकार्यक्षम तहसिलदार गणेश माळी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे दि.७ डिसेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुका अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व मागासवर्गीय नागरिक हे उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयात वेगवेगळ्या कामासाठी येतात. कामासाठी आलेल्या नागरिकांना तहसिलदार गणेश माळी हे अत्यंत अपमानास्पद वागणूक देतात. तसेच त्यांची काममे न करणे, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांना अरेरावीची भाषा वापरणे, अपशब्द वापरणे, काम न करता मला वेळ नाही, मी तुमच्या असल्या फालतू कामासाठी इथ बसलेलो नाही. विशेष म्हणजे उद्धट भाषा वापरीत माज आला आहे का ? तुझ्यावर ३५३ कलमा खाली गुन्हा दाखल करीन अशी धमकी देऊन नागरिकांना अपमानित करतात.  त्यांना त्यांच्या वर्तणुकीत बाबत त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी तोंडी समज दिली. मात्र त्यांच्या वर्तणुकीत फरक पडलेला नाही. वास्तविक तहसिलदार माळी हे कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी जनतेची कामे प्रलंबित न ठेवता त्यांना योग्य न्याय कसा मिळेल ? विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व नागरिकांची कामे तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. असे असताना त्यांच्याकडून वारंवार जाणीव पूर्वक कामाची अडवणूक होत आहे. तसेच जे बेकायदेशीर आहे, त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करणे गरजेचे किंवा किंबहुना आवश्यक आहे. मात्र काम करण्याऐवजी आलेल्या नागरिकांना अपमानित करण्याचा सपाटा लावणाऱ्या मग्रूर तहसिलदार माळी यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करून त्यांच्याकडील असलेला कार्यभार अन्य तहसिलदाराकडे सोपवून तालुक्यातील जनतेची या जाचातून मुक्तता करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनावर बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, ओबीसी संघर्ष समितीचे लक्ष्मण माने, शिवानंद केले, आबासाहेब खोत, पांडुरंग गायकवाड, कुणाल घोटीकर, काकासाहेब खोत, अनुज कुदाळ, बबनराव पवार, मराठवाडा अध्यक्ष भटके-विमुक्त संघटनेचे  सतीश कदम, डी.एन. कोळी, शुभम कदम, रवी कोरे, पांडुरंग लाटे, अरुण बनसोडे, रमेश माने, विजय खडसे, यु.एम. शेलार यांच्या सह्या आहेत.


 
Top