उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरीप २०२१ हंगामात उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे नुकसान हे ७० ते ८० % झालेले आहे, असा कृषी व पिक विमा कंपनीचा अहवाल आहे. योजनेच्या कार्यप्रणालीतील मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत रु. १५ ते १८ हजार/हे. पिक विमा देण्याचा बजाज अलायन्स कंपनीचा मानस आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यपद्धतीतील मार्गदर्शक सूचनांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक कापणी प्रयोग यामध्ये १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी असल्यास नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान व पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून निष्पन्न झालेले नुकसान ५०-५० टक्के प्रमाणे नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्याचे नमूद आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साधारणत: २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती. जिल्ह्यातील सोयाबीन पिकांची काढणी मात्र १५ ऑक्टोबर पासून सुरु केली जाते व पीक कापणी प्रयोग देखील या दरम्यानच घेतले जातात,  त्यामुळे हा नियम प्राप्त परिस्थितीत लागू होत नाही, याचा अर्थ असा की, नुकसान भरपाई प्रत्यक्ष झालेल्या नुकसानी प्रमाणेच अनुज्ञेय आहे.

सोमवार दि. ०६/१२/२०२१ पासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.  मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावण्यात आल्याने सध्याची देय नुकसान भरपाई कमी आहे. ही चूक दुरुस्त करून वाढीव पिक विमा द्यावा लागणार आहे व तो अधिकचे १५ ते १८ हजार /हे. च्या दरम्यान असणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण रु. ३० ते ३६ हजार प्रती हेक्टरी हक्काचे मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा चालू आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्यांनी आपले वाचन वाढविणे उपयुक्त राहील.

 
Top