उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन होऊन दैनंदिन कामकाज सुरू केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिकेच्या नवीन कोनशीला उद्घाटन समारंभानंतर यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पी.पी. शिंदे, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याणच्या सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,महिला व बालविकास चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बळीराम निपाणीकर, बांधकामचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. येतीन पुजारी,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये संविधान उद्देशिका प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने केल्याची घोषणा आपण केली.मात्र यामध्ये सातत्य राहिले नाही. दर शुक्रवारी पांढरा पोशाख परिधान करण्याची नियमावली का बंद झाली असा सवाल उपस्थित केला.

अधिकारी बदलला की धोरणे बदलली.हे जिल्हा परिषदेत चालणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाच्या माध्यमातून अमलात आणावी असे अध्यक्षा कांबळे यांनी सभाग्रह सांगितले.भारतीय संविधान उद्देशिकेचे यावेळी सामूहिक वाचन करण्यात आले.सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top