उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

निद्रिस्त आघाडी सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा सुरू झाली असून ही पदयात्रा उस्मानाबाद जिल्हयात येताच या यात्रातेत  अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाग घेऊन असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

  ही यात्रा सोमवारी १८ ऑक्टोबर २०२१ रोजी तुळजापूर येथे दाखल होणार आहे . अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यायला अद्याप मुख्यमंत्री मराठवाड्यात आले, ना कृषिमंत्री आले. २-३ दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर होईल, अशी आशा शेतकरी वर्गाला होती पण या सरकारने शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करून एकप्रकारे शेतकरी यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे दिसून येत आहे, अशी टीका यावेळी आमदार राणादादा पाटील यांनी केली. 

औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा ते तुळजापूर पदयात्रा काढण्यात आली आहे, आज सकाळी १७/१०/२०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात पदयात्रेचे आगमन होताच  तुळजापूर विधानसभा आमदार श्री राणाजगजितसिंहजी पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे , अभिमन्यु पवार यांनी शेतकऱ्यांसह या पदयात्रेत सहभागी होऊन तुळजापूरच्या दिशेने प्रस्थान केले. विशेष म्हणजे लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत दिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी खंत व्यक्त केली. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याची संवेदनशीलता, मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची सद्बुद्धी आघाडी सरकारला मिळावी असे साकडं आई तुळजाभवानी ला आम्ही घालणार असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यु पवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

     लातूर जिल्ह्यातील ११ तारखेचे नियोजित १२७ शेतकऱ्यांचे ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन आणि ही पदयात्रा म्हणजे आघाडी सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा पोहचवण्याचा प्रयत्न होता, यानंतरही सरकार जागं झालं नाही तर संघर्ष तीव्र करनार असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले .

 
Top