उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद: शेतात जायचे म्हटले की, महिला, शेतकऱ्यांसह मुक्या जनावरांनाही ‘अग्निदिव्य’ पार करावे लागायचे. पक्का तर सोडाच पण आहे, त्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरायचे. तर वाटेतच असलेल्या ओढ्यावर पुलाअभावी शेतकरीच नव्हे तर महिलांनाही कंबरे एवढ्या पाण्यातून धोकादायक वाट काढत शेत अन् गाव गाठावे लागत होते. मात्र सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी रस्त्याच्या डांबरीकरणासह पुलासाठी वारंवार प्रशासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. शिवाय काम तातडीने होण्यासाठीही मागणी लावून धरली. अखेर याला मोठे यश आले असून प्रत्यक्षात रस्ता डांबरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. तसेच सबमर्शिबल पुलासाठीही दीड कोटीचा निधी मंजूर असून लवकरच काम सुरू होणार आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा-शिंदेवाडी-मसोबापाटी हा साडेचार किमीचा रस्ता आहे. वर्षेनुवर्षे हा रस्ता दुरूस्तीअभावी खितपत पडला होता. रस्त्याची साधी दुरूस्तीही होत नसल्याने शिंदेवाडी, सारोळा, काजळा, सकनेवाडीसह वाघोलीतील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे हाल सुरू होते. याबाबत सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे वारंवार लेखी निवेदन, प्रत्यक्ष भेटूून रस्ता डांबरीकरणासह सबमर्शिबल पुल उभारण्याची मागणी लावून धरली.  तसेच आंदोलनाचा इशारा देवून मागणी पूर्ण करण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच रस्त्यावर जवळपास पाच नळकांडी पूल आणि सारोळानजिक ओढ्यावर सबमर्शिबल पुलासाठी तब्बल दीड कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. तसेच रस्त्याचे काम तातडीने करण्यासाठी श्री. बाकले यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर रस्ता डांबरीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली. सध्या रस्त्याचे काम वेगात सुरू असून सारोळानजिक ओढ्यावर सबमर्शिबल पुलाचेही काम सुरू होणार आहे. विशेषत: चिखलातून आणि कंबरे एवढ्या पाण्यातून वाट काढणाऱ्या महिला, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच ऊसासह इतर वाहने या मार्गावरून ‘सुसाट’ धावणार असल्याचे चित्र पहावयास मिळणार आहे.


 
Top