उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरात मंगळवार दि. १९ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजता फेसबूकवर आलेल्या प्रतिक्रियावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. या दगडफेकीत ६ पाेलिसासह अन्य कांहीजण जखमी झाले होते. पोलिस विभागाने रात्रीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून दगडफेक प्रकरणी ४३ प्रमुख आरोपींसह १५० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. 

उस्मानाबाद शहरातील विजय चौक भागात झालेल्या दगडफेक व पोलिसांवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद करण्यात आला आहे , पोलिसांकडुन आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली.

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यासाठी पोलीस दलाचे काही कर्मचारी गेल्यानंतर त्यांच्यावर 25 ते 30 जणांच्या जमावाने विटा , दगड , फरशी फेकून हल्ला केला. त्यानंतर पोलिसांची इतर टीम आल्यावरही 150 ते 200 जणांनी पुन्हा हल्ला केला यात सहायक पोलिस निरीक्षक सुर्वे, पोहेकॉ 992 शिंदे, पोना 1461 चव्हाण, पोअ गोरे, आरपीसी प्लॅटुनचे जाधव व चंचलवाड हे कर्मचारी जखमी झाले. पोलीस कर्मचारी सायलू बिरमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307,333,332,353,143,147,148,149, 294 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फरार आरोपींचा शोध पोलिसांची पथके घेत असुन तपास पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत हे करीत आहेत.


 
Top