उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयामध्ये दि. २० ते २२ सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज  हवामान विभागाने व्यक्त केला आहे .  या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये लवकर पेरणी केलेल्या आणि काढणीस तयार झालेल्या सोयाबीनची  लवकरात लवकर काढणी करून घ्यावी, काढणी केलेल्या पीकांचे ढीग (गंजी )  ताडपत्रीने झाकून ठेवावेत . मळणी  केलेले सोयाबीन पोत्यांमध्ये ठेवुन पाऊस लागणार  नाही. अशा जागी ही पोती ठेवण्याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

पीक विमा भरलेल्या पिकांचे  नुकसान विमा संरक्षित क्षेत्र  जलमय होऊन,ढगफुटी होऊन,पुराचे पाणी शेतात शिरुन,शेत दीर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेल्या पिकांचे  नुकसान झाल्यास घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी आणि ‍कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.यामध्ये नुकसान सर्वे नं‍बरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे  आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल.

 पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance  किंवा विमा कंपनीचे Farmmitra  हे ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या  टोल फ्री क्रमांकावर कळवावी. तसेच संबंधित गावचे कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्द्तीनेही अर्ज करुन ही माहिती कळवता येईल . असेही आवाहन  जिल्हयातील शेतकऱ्यांना   जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top